Sunday, February 15, 2026
Google search engine
spot_img

जिवघेण्या रस्त्यावर 3.5 कोटींचे रस्ता दुभाजक रस्ता नव्हे फक्त दुभाजक बनणार

चंद्रपूर :

बागला चौक ते राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज ते पुढे बल्लारपूर मार्गापर्यंत जागोजागी जीव घेणे खड्डे आहेत. या मार्गाने बाबूपेठ, भिवापूर वार्ड, लालपेठ इत्यादी भागात राहणारे नागरिक तसेच दोन्ही इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी वेकोलीचे कर्मचारी, शालेय विद्यार्थी हजारोंच्या संख्येने जाणे-येणे करतात. या मार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. रस्त्याची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. हजारो चंद्रपूरकरांना यामुळे मानेचा-मणक्याचा त्रास तसेच पाठदुखी व श्वसनाचा आजार अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे. तातडीने या रस्त्याचे काम करणे अत्यंत गरजेचे आहे. एका बाजूला 50 ते 60 मीटर सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम झाले. परंतु निधी अभावी उर्वरित काम रखडले.
काही दिवसांपूर्वी या रस्त्यावरील मजबूत व चांगल्या स्थितीत असलेले दुभाजक तोडण्याचे काम महानगरपालिकेने सुरू केले. अखेर रस्त्याचे काम सुरू झाले म्हणून नागरिकांनाही समाधान वाटले. या कामाला होत असलेला विलंब व त्यामुळे होणाऱ्या त्रासाची तक्रार करण्यासाठी एका स्थानिक नागरिकाने माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांच्याशी संपर्क केला. देशमुख यांनी सदर कामाबाबत माहिती घेण्यासाठी मनपाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. तेव्हा या ठिकाणी रस्त्याचे काम नव्हे तर केवळ रस्ता दुभाजकाचे काम होत असल्याची धक्कादायक माहिती देशमुख यांना मिळाली. 3 कोटी 56 लक्ष रुपयांच्या निधीतून शहरात 300 ते 400 मीटर लांबीचे दोन रस्ता दुभाजक तयार होणार आहेत. त्यावर काही झाडे लावणे व पाच वर्षाची देखभाल-दुरुस्ती याचा समावेश आहे असा खुलासा देशमुख यांनी एका पत्रकार परिषदेत केला. यावेळी माजी नगरसेविका पुष्पाताई मुन, माजी नगरसेवक स्नेहल रामटेके,मनिषा बोबडे,अक्षय येरगुडे, घनश्याम येरगुडे, प्रफुल बैरम,इमदाद शेख, सुभाष पाचभाई, देवराव हटवार, किशोर महाजन, कुशाब कायरकर, अमोल घोडमारे, चंद्रकांत जिवतोडे, अमुल रामटेके, शाबीर शेख उपस्थित होते.
ऑक्टोबर 2024 मध्ये या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. एप्रिल 2025 मध्ये मेसर्स सूर्यवंशी एंटरप्राइजेस या एजन्सीला कार्यारंभ आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

*प्रदूषण नियंत्रणासाठी आलेल्या निधीचा पुन्हा गैरवापर*

चंद्रपूर हे प्रदूषित शहर असल्यामुळे केंद्र सरकारकडून राष्ट्रीय शुद्ध व कार्यक्रमांतर्गत दरवर्षी प्रदूषण नियंत्रणासाठी येतो. हवेचा दर्जा सुधारण्यासाठी धूळ कमी करण्यासाठी विविध कामे याअंतर्गत केली जातात. नागरिकांचे आरोग्य प्रदूषणामुळे बाधित होऊ नये हा शासनाचा हेतू आहे. राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत 2022-23 ला मिळालेल्या निधीतून सव्वादोन कोटी रुपयांचा फाउंटेन घोटाळा करण्यात आला होता. 2024-25 ला मिळालेल्या निधीतून दोन रस्ता दुभाजक तोडून नवीन दुभाजक तयार करण्यात येत आहे.

*नागरिकांच्या आरोग्यासाठी कामे करता आली असती*

मनपाकडे सध्या संपूर्ण शहरासाठी पाण्याचे फवारे सोडणारी 50 लक्ष रुपये किमतीची एक मोठी फाॅगर मशीन आहे. अशा दोन मशीन घेऊन प्रत्येक झोनला एक मशीन देणे शक्य झाले असते. या मशीनने शहरातील धुळीवर नियंत्रण मिळवता येते. 30 लक्ष रुपये किमतीच्या तीन छोट्या स्विपिंग व एक कोटी रुपये किमतीची मोठी स्विपिंग मशीन आहे. यामध्ये भर घालता आली असती. एवढेच नव्हे तर रस्ता देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली बागला चौक ते राजीव गांधी इंजीनियरिंग कॉलेज पर्यंत रस्त्याचे कामही करता आले असते.

 

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments